Tuesday, March 9, 2010

आठवणीच्या गावात...


आठवणीचे गाव... या गावी जाणारे रस्ते तर सगळेच ओळखीचे; प्रत्येक पायवाट आपली, आपल्याच पाऊलखुणानी बनलेली...

मन आपलं वेडं वासरू. नकळत पुन्हा पुन्हा धाव घेतं तिकडे, पाऊलखुणा चाचपडत.. काही ठळक तर काही धूसर आणि काही काळाच्या ओघात मिटून गेलेल्या अश्या सर्वच ठश्यांच्या त्या पायवाटा तेवढ्या साक्षीदार..! अजूनही मुळ घट्ट रोवून उभी असणारी काही झाडं आणि काळासोबत उडून गेलेल्या पाखरांच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारी त्यांच्या फांद्यांवरची असंख्य घरटी. ती सगळीच पाखरं आपल्या ओळखीची, कारण हे आठवणीचं गावच मुळी आपलं...त्यातली बरीचशी फक्त आठवणीचाच भाग बनून उरलेली तर काही अजूनही आपल्या वर्तमानात रंग भरू लागणारी.

डोळयांसमोरून तरळणारे अनेक ऋतू...ऊन्हाच्या झळयांनी अंगाची लाही लाही करणारे, पावसाच्या बेधुंद सरींनी न्हाऊन निघालेले, गुलाबी थंडीने  शहारलेले...

कितीतरी आठवणी...
अनवाणी पायांनी अंगणात  हुंदडणा-या बालपणीच्या, उत्सुकतेपोटी आईला विचारलेल्या निरागस प्रश्नांच्या, त्यांना तितक्याच सहजतेने तिने दिलेल्या उत्तरांच्या, बाबांनी सुनावलेल्या कड़क शब्दांच्या, पुन्हा त्यांच्याच कुशीत शिरून फुटलेल्या हुंदक्यांच्या, शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकलेल्या पहिल्या दिवसाच्या, होस्टेलवर परक्यांमध्येही सापडलेल्या आपल्या माणसांच्या, समजून घेणा-या जिवलग मित्र- मैत्रिणींच्या, कट्ट्यावर बसून तासंतास मारलेल्या गप्पांच्या, टपरीवरच्या चहा-समोस्यांच्या, परिक्षेच्या दिवसांत जागून काढलेल्या रात्रींच्या,  त्या चार भिंतीत रंगणा-या खुल्या व्यासपिठाच्या, दूर जाताना ओघळणा-या अश्रुंच्या, कमवायला लागल्यावर ऑफिस मधल्या काही आपल्यांच्या तर काही परक्यांच्या...

अश्या असंख्य आठवणीच्या त्या पायवाटा. त्यांच्यावारूनच त्या गावात फिरायचा आणि मनसोक्त हुंदडण्याचा या मनाचा आवडता छंद! या पाऊलवाटा जश्या गावात नेतात तश्याच कळत- नकळत बाहेरही आणतात, वर्तमानाचं भान करुन देतात आणि त्याच मनाला एक बळ देतात वर्तामानातून भविष्यात एकेक पाऊल टाकण्याचं..आठवणीच्या गावात एका नव्या पाऊलवाटेची सुरुवात करण्यासाठी..!