किती झेलले पावसाळे आम्ही, असं म्हणणा-यांच्या त्या शब्दांची गम्मत वाटते. खरंच तुला कोणी झेलू शकतो का? ओघळून जातोस हातातून नकळत...तू कोणाच्या तावडीत न सापडणारा...मुक्त, स्वच्छंद..!
दाटून आलास की हलकेच रिमझिमणारा आणि वादळाशी हात मिळवलास की बेछूट कोसळणारा.. असा तू मला नेहमीच हवाहवासा...निर्बंध, निराकार आणि तितकाच निर्मळही! नाला होऊन वाहीलास किंवा मातीने माखलास तरी न मळणारा तू !
प्रत्येक सर तितकीच आतुर प्रत्येक वेळी मातीत मिसळण्यासाठी. मातीत मिसळूनही स्वतःचं अस्तित्व जपणारी...
किती गूढ आहे तुझ येणं... बरसणं...मिसळणं...वाहणं...आणि परतणंही...! ज्याला हे गूढ उमगलं, त्याने मिळवलं. बाकी पामरांसाठी तू फक्त पाणी आणि भिजलेली माती म्हणजे चिखल...बस्स...!
काही सुगंध आठवणींच्या गंधाचा दरवळ पसरवून जातात. चालता चालता पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहून आज पुन्हा ते दिवस आठवले, जेव्हा असाच सडा अंगणभर पडून बारीक नारंगी नक्षी अंगावर लेवून शुभ्र चटई अंथरल्याचा भास व्हायचा. तो सुवास हवेच्या प्रत्येक झोतासोबत झुलत, दरवळत राहायचा. पावसाने भिजवलेली झाडे आणि पानांवरून ओघळणारे पारदर्शी थेंब... गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक सावरत त्या फुलांना वेचून ओंजळीत घेऊन श्वास भरून तो सुवास उरात साठवण्याचा प्रयत्न करणारी ती चिमुरडी मी... आज पुन्हा आठवले मी मलाच...!
काही नात्यांची गुंतागुंत, खूप सारे प्रश्नं, सापडली म्हणताच पुन्हा हरवलेली त्यांची उत्तरं...परक्यांमधलं आपलेपण आणि आपल्यांमधलं परकेपण !
का आणतं एखाद्याला आयुष्य अश्या वळणावर? ज्यांना आयुष्यभर आपलं म्हणण्याची अतोनात इच्छा असते, तेच का आपल्याला परकं करून टाकतात? एकदाही विचार करत नाहीत नव्या नात्याचा, नात्यातल्या नाविन्याचा ? अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली एखाद्याला दाबून टाकून त्याच्या अपेक्षांची माती करणं कितपत योग्य आहे ? घट्ट कवटाळून घेण्यासाठी हात पुढे केल्यावर नेमका आपला हात झुगारून दिला जातो. मायेने जवळ घ्यावं असं वाटताच तुम्हाला कोणी उडवून लावावं. असं खरंच का होतं? नक्की चुकतं काय आणि कुठे?
खरंच का आपली सगळी ओळखच संपवून टाकावी लागते आयुष्यातल्या काही नव्या नात्यांना वाव देण्यासाठी ? त्याशिवाय ते नाहीच का कधी आपले होऊ शकत? पण मग असं करताना स्वतःच्याच नजरेला नजर मिळवतांना आपलं अस्तित्वच संपल्याची जी भयानक जाणीव होते तिचं काय? ती वाटून घ्यायला तर कोणीच येत नाही न सोबत? तुम्ही स्वतःलाही पण तर गमावलेलं असतं तोवर....!!!